Monday, April 19, 2010

वेगळा (भाग: १)

तो जरासा वेगळाच होता. जवळपास प्रत्येक बाबतीत. इतका की आजुबाजुच्यांना त्याचं वागणं कृत्रिम वाटायचं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या आवडी निवडी भिन्न आहेत हे केवळ स्वत:ला महत्वं प्राप्त करून देण्याकरता तो असा वागतो असं सर्वांना वाटायचं.

त्याला क्रिकेट आवडत नसे. गोड पदार्थांना तो नाक मुरुडत असे. जेवणात तूप बघितलं की त्याला घास जात नसे. ऐन उमेदीच्या काळात इतर मुलांप्रमाणॆ कर्कष्यं आवाजाची गाणी, डिस्को, पब्स, आवडलेल्या मुलीशी कमितकमी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, उछंद भटकणे, काही प्रसंगी धाडसीपणे वागणे असल्या गोष्टींमध्ये त्याला कधी रसच नव्हता. शाळेनंतर देखिल इतर मित्रांप्रमाणे प्रचलीत शिक्षणक्षेत्र निवडण्यात त्याला कधीही उत्साह नव्ह्ता. त्याच्या असल्या स्वभावामुळे तो बरेचदा एकटाच असायचा.

पौगांडावस्थेत त्याला आपल्यातील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवायला लागला. आपल्या आसपासच्या मर्यादित विश्वात स्वत:ला सामावून घेण्याचे अनेक असफ़ळ प्रयत्न त्यानी केले. इच्छा नसताना क्रिकेटची मॅच बघणे. मोठ्या आवाजात गाणी ऐकणे वगैरे. पण असल्या प्रकारात तो कधी रमलाच नाही. आडातच नसेल तर पोहऱ्यात कसं येणार? वाढत्या वयानुसार हे स्वभावविशेष अधिकच ठळक व्हायला लागले. मुळच्या उपजत स्वभावाला धरून जगावेगळं असं शिक्षणक्षेत्र त्याने निवडलं. सहाजीकच शाळेतील सगळे मित्र आणि तो वेगवेगळ्या वाटेनी आयुष्याचा प्रवास करू लागले. हळू हळू गाठी भेटी कमी होवू लागल्या. तोही नविन वातावरणात आणि मित्रांत रुळला. त्याच्या शाळकरी मित्रांप्रमाणे त्याच्या आई वडिलांनादेखिल त्याच्या जगावेगळ्या आवडीनिवडींबद्दल नवल वाटे. वडिलांचा जरी त्याच्या अप्रचलित क्षेत्रात शिक्षण घेण्यास विरोध होता, पण त्याच्यावर जबरदस्ती करणे त्यांना योग्य वाटले नाही. तो स्वत:देखिल त्याच्या वेगळेपणामुळे त्रस्तं होता. त्याच्या मनात सदैव "जगप्रसिद्ध" विरुद्ध "आपल्याला आवडते ते" असे द्वंद्व चालत असे. कधी "जगप्रसिद्ध" विचार जिंकत तर कधी "स्वाभिमानी" मन.

इतकं असून देखिल स्वत:ला नक्की काय हवं आहे ते त्याला कधी कळलं नाही. इतरांप्रमाणे जगावं, त्याच्यांसारखे छंद जोपासावे, तसल्याच आवडीनिवडी असाव्या असे त्याला सारखे वाटे. बरं तसा तो हुशार होता. अभ्यासातही आणि वागण्या बोलण्यातही. त्याची शालेय शैक्षणिक कारकिर्द बघून तो आयुष्यात अमाप पैसा मिळवणऱ्या क्षेत्रात जाईल असे अनेकांना वाटत असे, त्यालासुद्धा. पण वेगळेपणामुळे पैसा आणि प्रसिद्धी ह्या देखिल त्याच्या द्रुष्टीने अमहत्वाच्या गोष्टी होत्या. स्वत:ची कुशलता तो असल्या "वेगळेपणा" मुळे व्यर्थ घालवतो आहे असे त्याला वारंवार वाटे, पण स्वाभिमानी मन त्याला परावृत्त करत असे. 

वयं वाढत गेले. त्याचे शिक्षण आटोपले. अपेक्षेप्रमाणे चांगल्या पगाराची नौकरी मिळणे अवघड गेले. जी मिळेल ती पत्करून समाधान मानावे लागले. लग्नाचे वारे वाहू लागल्यावर साहाजीकच उपवर मुलींना त्याच्यातील वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव होवू लागली आणि नकार मिळायला लागले. ज्यांना तो आवडला त्यांनी त्याने नकार दिले. त्याचे आयुष्य चांगलेच भरकटले होते. त्याच्या स्वभावामुळे आई वडिल त्रस्त असायचे. त्याने स्वत:ने देखिल बदलायचे अनेक प्रयत्न केले, पण म्हणतात न, स्वभावाला औषध नाही.

अशा रितिने सांगुन यायच्या वयात मुली सांगून आल्या आणि हळू हळू तेही बंद झालं. इतक्या वर्षांच्या मानसिक आत्मसंघर्षानंतर तोदेखिल विटला होता. त्याचे नवे जुने मित्र अद्यापी संसाराला लागले होते त्यामुळे क्वचितप्रसंगीच ह्याच्यासाठी त्यांच्याजवळ वेळ असे. त्याला स्वत:लादेखिल इतर जोडप्यंमाध्ये संकोचल्यासारखं वाटे. अशारितीने आयुष्यात कुठलीही उजवी बाजू दिसत नव्हती. पण काही झाले तरी देवाला साकडं घालायचं नाही हे त्यानी मनाशी पक्कं ठरवलं होतं. कारण तो "नास्तिक" होता.

पण शेवटी त्याच्या आयुष्याचा अरुणोदय़ झालाच. अनपेक्षेने "ती" त्याला भेटली. त्याच्या कचेरीत नव्याने रुजु झालेली. स्वभावाने त्याच्यासारखीच. वेगळी, एकटी, भरकटलेली आणि उदास. साहाजीकच ओळख पुढे नेण्यास कुणी धजावत नव्ह्तं. पण ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची संधी होती. कोणालातरी शब्दांचा बांध फोडणं आवश्यक होतं. त्याचा विश्वास असो का नसो, पण म्हणतात न, जगात देव आहे. एक प्रसंग असा घडला की त्याने आणि तिने आयुष्यात असे काही घडेल असा स्वप्नांत देखिल विचार केला नव्हता. ६ महिन्यांपूर्वी कामानिमित्त जवळच्या फ़ूड मॉलमध्ये एकत्र "लंच" करताना गंमत म्हणून त्या दोघांनी एका प्रतियोगीतेचा फॉर्म भरला होता आणि त्या दोघांना परदेशवारीची दोन तिकिटे मिळाली होती! सुरवातीला त्यांचा आपल्या (करंट्या) नशिबावर विश्वासच बसेना. दुसरी धास्ती म्हणजे तिचे आई वडिल तिला त्याच्या बरोबर एकटे पाठवतील का? पण तिचा मोठा भाऊ त्याच देशात वास्तव्याला असल्यामुळे ती धास्ती राहिली नाही. आणि त्याची तिच्या घरात चांगली प्रतिमा असल्याने तिचे आई वडिलदेखिल तयार झाले.

यथावकाश जाण्याचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गमनाचा दिवस उजाडला. आयुष्यात प्रथमवेळाच परदेशी जात असल्याने दोघांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. विमानाच्या लांबलचक आणि कंटाळवाण्या प्रवासात कधी नव्हे तो एकांत त्याना मिळाला. आसपासच्या आसनांवर सर्व परदेशी प्रवासी असल्याने सहसा बोलताना वाटणारा संकोच आज त्या दोघाना वाटत नव्हता. आपण काय बोलतो आहे हे कुणाला कळणार नाही ह्याची काळजी नसल्याने काही वेळातच त्यांच्यातील सामाजिक भिती अर्थात "सोशल अ‍ॅन्झाईटी" दूर झाली आणि ती दोघे बांध फोडून बोलू लागली. इतकी की केवळ त्यांच्या अमर्यादीत बोलण्याच्या आवाजाचा सहप्रवास्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांनी काही काळापुरते नमते घेतले.


विमान परदेशभुमीवर उतरलं आणि ती दोघे सर्व सरकारी सोपस्कार पार पाडून तिच्या भावाला भेटले. त्याच्या गाडीतून शहराकडे जाताना चोहूबाजूला असलेल्या गगनचुंबी काचेच्या इमरती, सुरेख व स्वच्छ रस्ते आणि तिच्या भावाचा अखंड सुरु असलेल त्या शहराबद्दलच्या माहितीचा रेडीओ, ह्यापैकी कशावरही त्या दोघांचे लक्ष नव्हते. ना त्यांना प्रवासाच्या सुरुवातीला असलेलं त्या देशाचं अप्रूप राहिलं होतं. ती दोघेही त्यांच्या विमानातील संभाषणाचा विचार करत होती. अनावधाने एकमेकांना झालेले एकमेकांचे स्पर्श, ती जवळीक आणि झोपेत नकळत तीने त्याच्या खांद्यावर टाकलेली मान, हे त्याला सारखे सुखावत होते. तशी तो दोघही अद्याप तरूणच होती. उमेदीचा बराचसा काळ उलटून गेला असला तरी झाडाला पालवी टिकून होती.


(क्रमश:)

Sunday, April 18, 2010

सल्ला

असं म्हणतात की आयुष्यात फुकट मिळणारी एकमेव वस्तू म्हणजे "सल्ला". आता वकिलांचा अपवाद सोडला तर ही गोष्टं तशी सत्यच म्हणायला हवी. वकिलांशी माझा (सुदैवाने) कधीही संबंध न आल्याने कमीतकमी मला तरी ही फुकटी वस्तू हिमालयात बर्फ़ मिळावा तेवढ्या विपूलतेने मिळाली.

तशी सल्ल्याची सुरुवात ही बहुदा घरातील वडिलधाऱ्यांपासून होते. अनेकदा वडिलधारी मंडळी या सल्ल्यांना "मार्गदर्शन" असे गोंडस नाव देतात. अर्थात काहीप्रमाणात ते मार्गदर्शन जरी असलं तरी वडिलधारी मंडळी बरेचदा आपला उपजत "सल्लेगिरी" चा मोहं अश्या रितीने भागवत असते. मला वाटतं की माणसाच्या अनेक गरजांपैकी दुसऱ्याला सल्ला देणे, ही देखील एक गरज असावी. कारण बरेचदा आपला सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही हे ठाऊक असून देखील, फक्त तो ऐकला गेला तरी लोक समधानी होतात. आपलं ह्या जगात काही महत्व आहे हे समाधान, बहुदा हे त्यामागचे कारण असावे.

माझा सल्ला घेण्यास तसा विशेष आक्षेप नाही. पण ज्या लोकांचा एखाद्या ठराविक परिस्थितीशी कुठलाही संबंध नसतो आणि ज्याना कुठलाही अनुभव नसतो अश्यावेळी त्या सल्ला देण्याऱ्यांचं मला फार हसू येतं. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार होता. त्या बिचाऱ्यावर तर सल्ल्यांचा इतका मारा झाला. म्हणजे परदेशात कसं वागावं, काय सोबत न्यावं इथपासून तर किती परदेशी चलन सोबत नेता येतं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आवडी निवडी कोणत्या इथपर्यंत सगळ्या सांभावीक आणि असांभावीक घटनांवर सल्लेबाजी झाली. यातील गमतीची बाजू म्हणजे "सल्लेगार समिती" मधील एकही प्रतिनिधी कधी देशाबाहेर गेला नव्हता!

अनेकजण फ़ुकट सल्ल्याला "मदत" असही म्हणतात. अनेकदा सद्यपरिस्थीतीबद्दल स्वत:चं मत ठोकताना असले मदतनीस "माझ्या एका मित्रासोबत अगदी असचं घडलं होतं." हे वाक्यं लावून एखाद्या मिळत्या जुळत्या काल्पनीक परिस्थीतीचा आधार घेऊन सल्ला देतात. (ह्यांचे मित्रदेखील किती असतात हो? मला एकदा त्या प्रत्येक "मित्राला" प्रत्यक्ष भेटायचं आहे). बरं मित्राचा संदर्भ वापरण्याचे फायदे तीन. पहिला म्हणजे सल्ला देताना अनुरूप परिस्तिथीचा आपल्याला अनुभव आहे हे सिद्धं करणे. दुसरा म्हणजे काल्पनिक मित्राचा संपूर्ण "बायो डेटा" काढण्यात कुणाला फारसा रस नसल्याने "त्या" मित्राच "रेफ़रन्स चेक" कुणी करत नाही. तिसरी आणि सर्वात मुख्य म्हणजे दिलेला सल्ला चुकीचा ठरला तर तो सल्ला आपल्या "मित्राच्या" परिस्तिथीला उद्देशून दिला असल्याने सल्ल्याची जबाबदारी पूर्णपणे टाळणे. त्याचवेळी, जर सल्ला (चुकुन) उपयोगी पडला पाठ थोपटवून घेणे.


दुर्दैवानी, सल्लेगार समितीपासून स्वत:ला वाचवण्याचा तसा कुठलाही शास्त्रीयं तोडगा अद्याप उपलब्ध नाही. आणि नजिकच्या भविष्यात तसलं काही होण्याची चिन्हेदेखिल दिसत नाहीत. त्यामुळे अनावश्यक सल्ला "ऐकावे जनाचे करावे मनाचे" हे लक्षात ठेऊन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावा, हा एकच सल्ला मी सर्वांना देऊ इच्छितो!