Monday, May 10, 2010

काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं


परत एकदा पक पक पकाक बघत होतो. त्यात मधेच एक दु:खी पण अप्रतिम अशी ओळ आहे... "काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं, फ़िरून उकरावं, कशापायी?" माझ्या या पोस्टचा आणि चित्रपटातील प्रसंगाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मग संदर्भ सोडून हे वाक्य मी का निवडलं? तर काळाच्या मुठीतून जे निसटून गेलं आहे ते परत उकरुन काढण्यासाठी!

आजच्या माहिती तंत्रद्यानाच्या जगात बऱ्याचश्या मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा उकरुन काढता येतात. उदाहर्णार्थ जुन्या जाहिराती. मध्यंतरी "युट्युब" वर वेळ घालवताना अर्थात टि.पी. करताना काय काय सापडलं म्हणून सांगू! गोंडस पारशी मुलाची "जलेबी" वाली धारा तेलाची जाहिरात... अजन्ता घडाळ्याच्या ठोक्याना ताल देणारी आजी.. एशियन पेंटसची जवान सिमेवरून परत येतो आणि आरती घेताना आपल्या मुलाच्या हातावरून हात फ़िरवतो... फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीतर विचारायलाच नको! पारले जी ची "हमको पता है जी" वाले आजोबा आणि नातवंडं....इथपासून तर बुलंद भारत की बुलंद तस्वीर.....हमारा बजाज पर्यंत... खोटं वाटेल... पण अक्षरशह: डोळ्यातून पाणी आलं... का ते कळलं नाही. काळच्या ओघात वाहुन गेलेलं निरागस बालपण आठवल्यामुळे असेल कदाचीत....

तर हिप्नोटाईज्ड झाल्यासारखा मी एकामागून एक व्हिडीयोज बघायला लागलो. "एक चिडीया" आणि "मिले सुर मेरा तुम्हारा" बघुन तर लहान मुले कार्टुन बघताना करतात तसा माझा चेहरा झाला होता:) "पूरबसे सुर्य उगा" वाली साक्षरता मिशनची जाहीरात बघून खरच सरकारी माध्यमांचं कौतुक करावसं वाटलं. त्याकाळी मोजकी साधनं असुनही जनजागृतीची ही अप्रतीम जाहिरात त्यानी बनवली होती.

ही पोस्ट केवळ जुन्या जाहिरातींबद्दल नाही. काही जीव्हाळाच्या गोष्टी; ज्यांचा कालांतराने त्या कालबाह्य झाल्याने विसर पडला, त्या उकरुन काढण्यासाठी ही पोस्ट. त्यापैकी काहींची यादी खालील प्रमाणे....

लहान मुलांसाठी असलेलं एकमेव मराठी कॉमिक्स...... "चांदोबा"

डस्टर-पिंजर-खार-कबुतर-ढोली असला "रॉक-पेपर-सिझर" चालीवरचा मराठी खेळ (मी कबुतरला खब्बुतर म्हणत असे कारण खार म्हंटल्यावर कबुतर पेक्षा खब्बुतर म्हणणं सोपं पडे :))

मुलींकरता असलेला खेळ.....भुलाबाई (मी लहान असताना माझ्या बहिणीबरोबर जात असे. भुलाबाईचे गाणे थोडे थोडे अजुनही आठवतात. त्यात अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता.... भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असल्या चालीवर एक यमक जुळणारं गाणं होतं, ते माझं "फ़ेव्हरेट"!)

कंचे (कंचे म्हणजे खेळण्यातले काचेचे मार्बल्स) आणि कंच्यासारख्याच पण पांढऱ्या, दगडी आणि मोठ्या असलेल्या पखांड्या.

अंधळी कोशींबीर... (हि बहुदा अजुनही खेळली जाते)

डोंगराला आग लागली पळा पळा नावाचा एक मैदानी खेळ होता.... तो कसा खेळतात ते आता आठवत नाही :(


आमलेट की चॉकलेट हा ७ चौकट आखुन खेळाला जायचा. त्याची रचना
 खालीलप्रमाणे होती.



क्रमाक्रमाने एक एक रकान्यान दगड टाकत जायचा आणि ज्या रकान्यानत दगड असेल त्या रकान्याशिवाय उरलेल्या रकान्यात लंगडी घालत जायचं आणि परत यायचं. दगड ठरलेल्या रकान्याच्या बाहेर गेला किंवा दोन्ही पाय जमिनीला टेकले की खेळाडू बाद!

उन्हाळ्यात पाहुणे घरी आले कि दुपारी ठरलेला खेळ..... व्यापार आणि पट (होय...तोच शकुनी मामावाला). शिवाय सत्ते लावणी, पाच-तिन-दोन, रमी हे ही होतेच.

पावसाळ्यात मामाच्या गावी एक "खुपसणी" नावाचा खेळ असायचा. लोखंडाची सळाख दुर फ़ेकायची. ओल्या जमिनीमुळे ती आत खुपसायची म्हणून खुपसणी!

युनिसेक्स खेळ.... लगोरी.

सर्वात लोकप्रिय हिंदी कॉमिक्स.... चाचा चौधरी (चाचा चौधरी का दिमाग कॉम्प्युटरसेभी तेज चलता है! :))

दुरदर्शन वरिल गाजलेल्या मालिका..... चंद्रकांता, स्कूल डेज, सॅम और गोपी वाली तहकीकात, पंकज कपूर ची फ़टीचर आणि करमचंद जासुस, अलिफ़ लैला, अफ़साने, इ. इ.

सध्या इतकाच.... तुम्हाला आठवलं असं काही तर मलाही कळवा!

Monday, May 3, 2010

भेटवस्तू

आटपाट नगर होतं. सम्पन्नं, समृद्धं आणि निटनेटकं. नगराचा राजा हा अतिशय गुणी, सज्जन आणि शांतीप्रिय होता. त्याला आपल्या प्रजेवर स्वत:च्या मुलासारखे प्रेम होते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे तो प्रजाजनांचा सांभाळ करत असे. प्रजादेखिल अत्यंतं सुखी होती आणि राजाला देवाप्रमाणे पुजत असे.

राजाचा वाढदिवस होता. संपूर्ण आटपाट नगर फ़ुलांनी सजवण्यात आलं होतं. ठिकठिकाणी राजाच्या सन्मानार्थ कार्यक्रम ठेवले गेले होते. दुरदुरच्या नगरांतून येऊन लोक आपली कला सादर करीत होते आणि राजाकडून भरघोस पारितोषिकं घेऊन जात होते. आपल्या प्रजाजनांचं प्रेम बघून राजाला अगदी भरुन येत होतं.

दिवस मावळत आला होता. राजा आपल्या माहालाकडे निघाला होता. तेवढ्यात वाटेत एक भिकारी राजासमोर आला. शिपायांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण राजाने त्यांना अडवले आणि भिकाऱ्याला आपल्याजवळ बोलावले. दिवसभर भिक मागून मागून तो दमला असल्याचे राजाला लक्षात आले. त्याची झोळी धान्यांनी जवळजवळ पूर्ण भरली होती. तो सकाळपासून राजाला भेटण्याचा प्रयत्न करत होता.

हे ऐकून राजाने एका शिपायाला त्याला १०० सुवर्ण मोहोरा दान देण्यास सांगितले. पण भिकारी म्हणाला, "नाही महाराज, मी दान घेण्यासाठी आपली वाट बघत नव्ह्तो. आज आपला वाढदिवस. आपल्या सारखा राजा या नगरीला लाभला हे आमचं सौभाग्य. आपल्या वाढदिवसानिमीत्त आम्ही आपल्याला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे." हे ऐकून राजाला नवल वाटले. यापुर्वी कुणीही असे काही बोलले नव्हते. प्रजाजनांचीही चूक नव्हती. शेवटी राजाच तो, त्याला प्रजा काय बरं भेटवस्तू देणार?

राजा उत्सुकतेने म्हणाला, "ठिक आहे, पूर्ण दिवस मी इतरांना भेटवस्तू दिल्यात. तु शेवटचा मला भेटतो आहेस, तर तुच मला भेटवस्तू दे." राजाने हात पुढे केले. भिकाऱ्याने आपल्या झोळीतून एक मुठ धान्य राजाच्या हातावर ठेवले. ते पाहून राजाने मंद स्मित केले. तेवढ्यात भिकाऱ्याने पुन्हा आपला हात झोळीत घातला आणि आणखीन एक मुठ राजाच्या हातावर ठेवली. राजा आश्चर्यानी बघायला लागला. त्या झोळीतील धान्य हे कदाचीत त्या भिकाऱ्याचं पुढल्या काही दिवसांचं अन्न होतं. त्यानंतर आणखी एक मुठ, अजुन एक, अजुन एक, धान्य राजाच्या हातातून जमिनीवर सांडायला लागलं. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहु लागले. एक एक करता त्या भिकाऱ्याने आपली संपुर्ण झोळी राजाच्या वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून रिकामी केली आणि तो आपल्या मार्गाने निघुन गेला.

(समाप्त)

=========================================

ता.क.: हि कथा माझी नाही आणि मी ती कुठल्याही ब्लॉगवरूनही उचलली नाही. लहानपणी कधीतरी वर्तमानपत्रातील बालविभागात वाचण्यात आली होती. दिड दशकं जाऊनही ही कथा अकारण माझ्या मनात घर करून बसली. ती पुर्णपणे आठवत नसली तरी शेवट असाच होता.

Sunday, May 2, 2010

वेगळा (भाग: २)

घरी पोहोचल्यावर एक दोन दिवसांचे प्लॅन्स झाले. तीचा भाऊ कामात व्यस्त असल्याने पुढचे बरेचसे दिवस त्या दोघांनाच फ़िरायचे होते. त्याला तर ह्या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला होता. जसे जसे दिवस जाऊ लागले, त्याला तिचे रोज एक नवे रूप दिसू लागले. मनसोक्त भटकताना, गप्पा मारताना आणि हवा तसा श्रोता मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. दिवसोंदिवस ती त्याला अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या चेहऱ्या सकाळचा ताजेपणा होता.

असेच एकदा बोलता बोलता तिने विषय काढला. स्वत:च्या जगावेगळ्या आवडी निवडींबद्दल. प्रत्येक बाबतीत असेली मतांची तफ़ावत... छंद... जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन आणि मानसिक द्वंद्वातून आलेली मरगळ.... जणूकाही त्याचं प्रतिबिंबच. तिची व्यथा त्याला चटकन लक्षात आली. त्याला तिच्याबद्दल साहनूभुती तर वाटलीच, पण जगात आपण एकटेच असे नाही ह्याचा कुठेतरी एक स्वार्थी आनंदपण झाला. त्याने लगेच तसले विचार झटकून टाकले. बिचकत बिचकत स्वत:बद्दल देखिल सांगीतले. इतक साधर्म्य एकून क्षणभर तिचा विश्वासच बसेना. हा आपली थट्टा तर करत नाहीये ना? करत असल्यास फ़ार वाईट थट्टा आहे, असले विचार तिच्या मनात येऊन गेले. पण एव्हाना त्याच्या डोळ्यात पाणी तरारले होते. तो खरं बोलतोय हे तिच्या लक्षात आले.

एकमेकांचे अनुभव ऐकल्यावर दोघांनाही एकमेकांबद्दल वाईट वाटले. पण असं का? आपण असे का? ह्यात आपली काय चूक? सगळॆ करतात तेच आपणही केलच पाहिजे असा अट्टाहस का? जरी कुणी प्रत्यक्ष विरोध किंवा उपरोध केला नसला तरी एक अप्रत्यक्ष सामाजीक तणाव कशासाठी? अर्थात, ह्या प्रश्नांची उत्तरं दोघांकडेही नव्हती. तरीही, आलिया भोगासी असावे सादरं, हे काही त्यांना पटत नव्हतं. आपली परिस्थीती बदलावी, आपण आनंदी आयुष्यं जगावं, मित्रमैत्रिणींमध्ये एकरुप व्हावं असं दोघांनाही वाटत होतं.

यावर त्याने एक तोडगा सुचवला. अनेक दिवस त्याच्या डोक्यात हा विचार घुटमळत होता. "आपण एकदा मानसिकरोगतज्ञाकडे जाऊन बघुया का?" त्याच्या ह्या प्रश्नाने ती तिन ताड उडालीच! "काय??" आपण वेगळे म्हणजे मानसिक रोगी?? तिला गरगरायला लागलं. ति थोडावेळ काहीच बोलली नाही. धक्का सावरल्यावर काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला, "हे बघ चक्रावू नकोस. माझ्या वाचण्यात एक लेख आला होता. त्यात दिलेल्या काल्पनिक उदाहरणाशी आपला स्वभाव तंतोतंत जुळतो. बरेच दिवसात ह्या बाबतीत कुणाचातरी सल्ला घ्यावा असं वाटत होतं. पण आपल्या देशात मानसिकरोगतज्ञाकडे जाणे म्हणजे स्वत:ला पागल सिद्ध करण्यासारखं आहे. अनायसे हि संधी आपल्याला मिळाली आहे. आयुष्य रुळावर आणण्यासाठी जर डॉक्टरला भेटावं लागत असेल तर ही फ़ार छोटी किंमत आहे." हे सर्व ऐकल्यावर ती गंभीर झाली. आयुष्य बदलावं अस तिलाही वाटत होतं. आणि तोही तिच्यासारखाच असल्याने तिचा विश्वास बसला आणि त्यांनी प्रयत्नं करायचं ठरवलं.

भावाला सांगावं की नाही हादेखिल प्रश्नं होताच. पण तो तिथला स्थानिक असल्याने त्याची मदत होवू शकते आणि हि पायरी चढताना कुटुंबातील एखाद्या सदस्याला ठावूक असणे गरजेचे आहे हे दोघांनाही पटले. त्याच रात्री घरी ह्यावर चर्चा झाली. तिच्या भावाला जरी हे सगळं निरर्थक वाटत होतं, पण आपल्या बहिणीच्या डोळ्यातील पाणी बघुन त्याला परिस्थीचा अंदाज आला आणि त्याने एक तज्ञ सुचवला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती दोघे तज्ञाकडे रवाना झाली. सुमारे तास दोन तासांच्या कंसल्टेशन नंतर एक विचित्र बातमी त्यांना मिळाली. त्याची भिती खरी होती. त्या दोघांना एक विचित्र मानासिक आजार होता. त्यांच्या वयक्तीक आणि व्यवसायीक दुर्गतीस कारण त्यांचं वेगळेपण नसून हा आजार होता. धरसोड व्रुत्ति, ठरवलेल्या गोष्टी पुर्णत्वास न नेणे, आपल्याच मतांचा होणारा घोळ, स्वत:ला नक्की काय हवयं ते न कळणे आणि जोडीला अत्यंतं लहरी स्वभाव, ही सर्व लक्षणं होती "बायपोलर डिस-ऑर्डरची". दुर्मिळ नसणारा पण प्रखरता सहसा कमी असणारा हा मानसीक आजार त्यांना वेढून होता. आजार होण्यामागचं कारण हे जेनेटीक असल्याने नक्की दोष कुणालाही देता येत नव्हता.

आपल्याला मानसिक रोग आहे हे कळल्यावर तिला रडूच कोसळले. पण इतर मानसिक रोगांप्रमाणे हा समाजोप्रदवी रोग नसून थोडे व्यायाम आणि औषधी यांनी आटोक्यात ठेवता येतो हे ऐकल्यावर दोघांनाही हायसं वाटलं. डॉक्टरचं बोलणं आठवून ती दोघे स्वत:च्या स्वभावाबद्दल, आयुष्यातील चुकांबद्दल आणि सद्यपरिस्थीबद्दल विचार करु लागली. हळु हळु समिकरणं जुळु लागली, कारणं सापडू लागली आणि स्वत:बद्दलचा अनादर कमी होवू लागला. एक विलक्षण आत्मविश्वास त्यांना जाणवू लागला आणि यापुढे आयुष्य सुखात जाणार, कमितकमी आपण तसा प्रयत्न करणार, आपण चारचौघांसारखेच आहोत, जे आपल्याजवळ आहे त्यातच सुख भोगु वगैरे वगैरे लाखो विचार त्यांच्या मनात यायला लागले. गमतीची गोष्टं म्हणजे, हा मानसीक रोग काही फ़ायदेपण देतो असं डॉक्टर म्हणाल्याचं त्यांना आठवलं. कलेची आवड असणाऱ्यांना या रोगचा जास्तच फ़ायदा मिळतो. जगातील अनेक थोर कलावंत या रोगाने त्रस्त होते, पण ह्या रोगानी त्यांना बहाल केलेल्या "वेगळेपणा" मुळेच ते समाजात उठुन दिसले आणि यशस्वी झाले!

सुट्टी संपली आणि ती दोघे भारतात परतली. पूर्णपणे बदलून, प्रचंड आत्मविश्वास घेऊन आणि आता पर्यंत जे जे गमावलं ते परत कमवायला. दोघेही हुशार होतीच. हळु हळु नोकरीतही त्यांच्या बदलेल्या स्वरुपाची दखल घेतल्या जाऊ लागली. सोन्यावरची धुळ उडाल्याने सोनं लखलखून चकाकू लागलं. आपल्यातला वेगळेपणा हा श्राप नसून वरदान आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या ह्या क्षमतेचा वापर करुन उत्तुंग भरारी घेण्याकरिता नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय थाटला. थोड्याच कालावधीत आपल्या क्षेत्रात त्यांनी चांगलाच जम बसवला. अपेक्षेप्रमाणे ती दोघे केवळ व्यवसायीक भागीदार न राहता आयुष्याचीही भागीदार झाली.

काही वर्षांतच तो एक यशस्वी उद्योजक म्हणून नावजला. अनेक बिझनेस स्कूल्समध्ये त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावण्यात येऊ लागले. प्रत्येकवेळी लेक्चर संपल्यावर तो एक वाक्य सांगायला विसरत नसे, "इतिहास तेच घडवतात जे वेगळा विचार करु शकतात. चौकटी बाहेर विचार फ़ार कमी लोक करु शकतात. जगात सरळ रस्त्यावर चालणारे तुम्हाला बरेच भेटतील, पण वाकडी तिकडी का होइना, पण स्वत:ची वाट बनवणारे आणि स्वत:च्या इष्टस्थळी पोहोचणारे फ़ार कमी असतात." 

==========================================

(समाप्त)