Thursday, April 13, 2017

परत श्रीगणेश!

नमस्कार मित्रांनो!

तब्बल सात वर्ष्यांच्या प्रदीर्घ अवकाशानंतर परत एकदा लिहिणं सुरु करण्याचा विचार आहे. असं म्हणतात की सात वर्ष टिकलेली मैत्री आयुष्यभर टिकते. या २३ ऑगस्टला मला लिहून सात वर्ष होतील. मैत्रीचा नियम लिखाणाला लागू केला तर महिन्यांनी माझा ब्लॉग expire झाला असता ;-) तसा मधे मधे, म्हणजे वर्षांतून - वेळा मी माझ्याच ब्लॉगला भेट देत होतो. अजूनही अनेक देशातील काही मराठी वाचक मित्र ब्लॉगवर येत असतात. बहुदा काही keywords search त्यांना माझ्या ब्लॉग वर आणत असावेत.

तर मी लिहिणं बंद का केलं? कारण काहीच नाही. काही सुचलं नाही (writer's block! हा हा.. "मी writer" म्हणे), जे सुचलं ते ब्लॉगवर टाकण्यासारखं आहे असं वाटलं नाही, आळशीपणा (हे सगळ्यात मोठं कारण!), सांसारिक जाबदाऱ्या, ई.... अर्थात ही सगळी बहाणेबाजी झाली. ज्याला लिहायचं आहे तो वेळ काढून लिहितोच.

२०१० मध्ये सुरुवातीला जेव्हा ब्लॉग्स वाचायला सुरु केले, तेव्हा मी अक्षरशः झपाटून गेलो होतो. सकाळचा चहा पिताना ब्लॉग्स वाचणे हा त्यावेळी माझा सर्वात आवडता छंद होता. रविवारी तर कमीतकमी तास मी मराठी ब्लॉग्स वाचत असे. वाचताना वाटलं की हे सगळे ब्लॉगर्स तर आपल्यासारखेच वाटतात. लिहितात पण रोजच्या सामान्य घडामोडी. असं असूनही मला ते इतके का आवडतात? याचं कारण मला अजूनही उलगडलं नाहीये. अत्यंत अनियमितपणे का होईना, मी अजूनही काही ब्लॉग्स वाचतो. माझ्या बर्याचश्या आवडत्या ब्लॉगर्सनी लिहिणे बंद केले आहे याचे वाईट वाटते. अर्थात मी का ते समजू शकतो. वाईट वाटण्याचे कारण की हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मला या मराठी ब्लॉगविश्वात खिळवून ठेवले, नव्हे वेडावून लावले. पु.लंची पुस्तकं आणि न्यूजपेपर वाचण्यापलीकडे जर आणखी काही मराठी वाचण्याची सवय लागली ती ह्या ब्लॉगर्स मुळे. अजूनही मला त्यांची नावे माहित आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याची इच्छा आहे. ते शक्य आहे कि नाही माहित नाही. कमीत कमी त्यांनी पुन्हा लिखाण सुरु करावं असं नक्की वाटतं. माझ्या चाहत्या ब्लॉगर्स ची नाव टाकण्याचा मोह अनावर होतोय पण त्यांना ते आवडेल कि नाही हे माहित नसल्याने तो मोह आवरतो.

तसं या सात वर्षात माझ्या आयुष्यात बराच बदल झाला. चांगला आणि वाईट. अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. काही महत्वाच्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्याने मन खट्टुही झालं. पण हे सगळं चालायचंच.

तसं ब्लॉग परत सुरु करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फावला वेळ. सध्या माझ्या ऑफिसमध्ये काही बदल होत आहेत, department wise. ते बदल लागू होईपर्यंत अक्षरशः फक्त ऑफिसात "हजेरी लावणे" एवढेच काम आहे. तरी बरं कॉम्पुटर आणि इंटरनेट access आहे. त्याचवेळी मी परत, विरंगुळा म्हणून, ब्लॉग्स वाचायला सुरु केले आणि हा हा म्हणता परत त्या सोनेरी दिवसात पोहोचलो. स्वतःचा ब्लॉग बंद केल्याची हळहळ झाली आणि महत्प्रयासानी परत लिहिण्याचं धाडस केलं. आता हे किती दिवस चालेल कोण जाणे. काम परत सुरु झाल्यावर "जैसे थे" परिस्थिती ओढवली नाही म्हणजे मिळवली.


बघू..कुठपर्यंत उत्साह टाकतोय!

Monday, August 23, 2010

मोठेपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... ह्या सुभाषीतावर दुमत व्हायचं कारण नाही. मोठी माणसे (वयानी) नेहमी बालपणाचं कौतुक करताना दिसतात. मी देखिल त्याला अपवाद नाही. लहानपणी काय कसलाच ताण नाही. दररोज ऑफ़िसला जाणं, घरासाठी खरेदी करणं, बिलं भरणं, कर्जांचे हप्ते, मुलांच्या शाळा, त्यांचं संगोपन, आयकर भरणं, इतर जबाबदाऱ्या कसलही टेन्शन नाही. आरामात आयुष्य जगण्याचा खरा आनंद केवळ बालपणात लुटता येतो.

प्रौढावस्थेतून बालपणात परतण्याचं एखादं यंत्र असतं तर काय मजा आली असती नाही? पण प्रामाणिकपणे विचार केल्यास किती प्रौढांना परत बालपणात जावसं वाटेल? प्रौढांवर अनेक जबाबदाऱ्या असतात हे मान्य. पण वयानुसार येणारा अनुभव आणि आदर लहान मुलांना खरच मिळतो का? एखादं कटकट करणारं कार्ट आपण हिडिस फ़िडिस करुन हाकलून लावू शकतो, लहान वयात मुलांना विशेष आदर देण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण आपण लहान असताना कुणी आपल्याशी असं वागतं तेव्हा खरच आपल्याला आवडतं का? बरं तुच्छतेने वागणारा आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्याची चुक असून देखिल वयोमानानुसार उलट उत्तर देता येत नाही. पण एखाद्या प्रौढाशी आपण तसं सहसा वागू शकतो का? अनेक कर्तुत्व करण्याचं कौशल्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचं सामर्थ्य हे प्रौढावस्थेतच येतं.

लहानपणी रोजची शाळा, अभ्यास, आई वडिलांचा धाक, अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून न करता येणं आणि आजच्या वातावरणातला ताण यासारख्या जबाबदाऱ्या, न कळता का होईना, असतातच. शाळेत अव्वल येण्यासाठी, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लहानपणी देखिल असह्य ताणं झेलावा लागतो. प्रौढांप्रमाणे हवी ती वस्तू विकत घेणे, वाटेल तेवढा वेळ टि.व्ही. बघणे, कुठल्याही वयोगटाशी कुठल्याही विषयावर चर्चा करणे या सारख्या मोठीपणी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी लहानपणी सहसा वर्ज्य असतात. थोडक्यात म्हणजे लहानपण हे स्वातंत्र्याला पारखं असतं. स्वातंत्र्य असायला हवं की नाही हा इथे मुद्दा नाही. पण साधारणत: ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. ५-६व्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते "क्युट" या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्ह्यायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. "लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक", असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विषेश अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सुचीत करायचं नाहीये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला ६ महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदाऱ्या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा  उगिचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षीतो? बहुदा या भावेनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.

माझे बालपण अतिशय त्रासात गेले असे नाही. तेही चारचौघांसारखेच होते. पण त्यावेळी लवकर मोठे होण्याची फ़ार इच्छा होती. आता (वयाने) मोठा झाल्यावर बालपणातल्या आठवणीत कधीकाळी रमायला आवडतं, पण परत लहान होणं? नको रे बाबा... मोठेपण ठेवा देवा...