Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Sunday, May 2, 2010

वेगळा (भाग: २)

घरी पोहोचल्यावर एक दोन दिवसांचे प्लॅन्स झाले. तीचा भाऊ कामात व्यस्त असल्याने पुढचे बरेचसे दिवस त्या दोघांनाच फ़िरायचे होते. त्याला तर ह्या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला होता. जसे जसे दिवस जाऊ लागले, त्याला तिचे रोज एक नवे रूप दिसू लागले. मनसोक्त भटकताना, गप्पा मारताना आणि हवा तसा श्रोता मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. दिवसोंदिवस ती त्याला अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या चेहऱ्या सकाळचा ताजेपणा होता.

असेच एकदा बोलता बोलता तिने विषय काढला. स्वत:च्या जगावेगळ्या आवडी निवडींबद्दल. प्रत्येक बाबतीत असेली मतांची तफ़ावत... छंद... जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन आणि मानसिक द्वंद्वातून आलेली मरगळ.... जणूकाही त्याचं प्रतिबिंबच. तिची व्यथा त्याला चटकन लक्षात आली. त्याला तिच्याबद्दल साहनूभुती तर वाटलीच, पण जगात आपण एकटेच असे नाही ह्याचा कुठेतरी एक स्वार्थी आनंदपण झाला. त्याने लगेच तसले विचार झटकून टाकले. बिचकत बिचकत स्वत:बद्दल देखिल सांगीतले. इतक साधर्म्य एकून क्षणभर तिचा विश्वासच बसेना. हा आपली थट्टा तर करत नाहीये ना? करत असल्यास फ़ार वाईट थट्टा आहे, असले विचार तिच्या मनात येऊन गेले. पण एव्हाना त्याच्या डोळ्यात पाणी तरारले होते. तो खरं बोलतोय हे तिच्या लक्षात आले.

एकमेकांचे अनुभव ऐकल्यावर दोघांनाही एकमेकांबद्दल वाईट वाटले. पण असं का? आपण असे का? ह्यात आपली काय चूक? सगळॆ करतात तेच आपणही केलच पाहिजे असा अट्टाहस का? जरी कुणी प्रत्यक्ष विरोध किंवा उपरोध केला नसला तरी एक अप्रत्यक्ष सामाजीक तणाव कशासाठी? अर्थात, ह्या प्रश्नांची उत्तरं दोघांकडेही नव्हती. तरीही, आलिया भोगासी असावे सादरं, हे काही त्यांना पटत नव्हतं. आपली परिस्थीती बदलावी, आपण आनंदी आयुष्यं जगावं, मित्रमैत्रिणींमध्ये एकरुप व्हावं असं दोघांनाही वाटत होतं.

यावर त्याने एक तोडगा सुचवला. अनेक दिवस त्याच्या डोक्यात हा विचार घुटमळत होता. "आपण एकदा मानसिकरोगतज्ञाकडे जाऊन बघुया का?" त्याच्या ह्या प्रश्नाने ती तिन ताड उडालीच! "काय??" आपण वेगळे म्हणजे मानसिक रोगी?? तिला गरगरायला लागलं. ति थोडावेळ काहीच बोलली नाही. धक्का सावरल्यावर काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला, "हे बघ चक्रावू नकोस. माझ्या वाचण्यात एक लेख आला होता. त्यात दिलेल्या काल्पनिक उदाहरणाशी आपला स्वभाव तंतोतंत जुळतो. बरेच दिवसात ह्या बाबतीत कुणाचातरी सल्ला घ्यावा असं वाटत होतं. पण आपल्या देशात मानसिकरोगतज्ञाकडे जाणे म्हणजे स्वत:ला पागल सिद्ध करण्यासारखं आहे. अनायसे हि संधी आपल्याला मिळाली आहे. आयुष्य रुळावर आणण्यासाठी जर डॉक्टरला भेटावं लागत असेल तर ही फ़ार छोटी किंमत आहे." हे सर्व ऐकल्यावर ती गंभीर झाली. आयुष्य बदलावं अस तिलाही वाटत होतं. आणि तोही तिच्यासारखाच असल्याने तिचा विश्वास बसला आणि त्यांनी प्रयत्नं करायचं ठरवलं.

भावाला सांगावं की नाही हादेखिल प्रश्नं होताच. पण तो तिथला स्थानिक असल्याने त्याची मदत होवू शकते आणि हि पायरी चढताना कुटुंबातील एखाद्या सदस्याला ठावूक असणे गरजेचे आहे हे दोघांनाही पटले. त्याच रात्री घरी ह्यावर चर्चा झाली. तिच्या भावाला जरी हे सगळं निरर्थक वाटत होतं, पण आपल्या बहिणीच्या डोळ्यातील पाणी बघुन त्याला परिस्थीचा अंदाज आला आणि त्याने एक तज्ञ सुचवला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती दोघे तज्ञाकडे रवाना झाली. सुमारे तास दोन तासांच्या कंसल्टेशन नंतर एक विचित्र बातमी त्यांना मिळाली. त्याची भिती खरी होती. त्या दोघांना एक विचित्र मानासिक आजार होता. त्यांच्या वयक्तीक आणि व्यवसायीक दुर्गतीस कारण त्यांचं वेगळेपण नसून हा आजार होता. धरसोड व्रुत्ति, ठरवलेल्या गोष्टी पुर्णत्वास न नेणे, आपल्याच मतांचा होणारा घोळ, स्वत:ला नक्की काय हवयं ते न कळणे आणि जोडीला अत्यंतं लहरी स्वभाव, ही सर्व लक्षणं होती "बायपोलर डिस-ऑर्डरची". दुर्मिळ नसणारा पण प्रखरता सहसा कमी असणारा हा मानसीक आजार त्यांना वेढून होता. आजार होण्यामागचं कारण हे जेनेटीक असल्याने नक्की दोष कुणालाही देता येत नव्हता.

आपल्याला मानसिक रोग आहे हे कळल्यावर तिला रडूच कोसळले. पण इतर मानसिक रोगांप्रमाणे हा समाजोप्रदवी रोग नसून थोडे व्यायाम आणि औषधी यांनी आटोक्यात ठेवता येतो हे ऐकल्यावर दोघांनाही हायसं वाटलं. डॉक्टरचं बोलणं आठवून ती दोघे स्वत:च्या स्वभावाबद्दल, आयुष्यातील चुकांबद्दल आणि सद्यपरिस्थीबद्दल विचार करु लागली. हळु हळु समिकरणं जुळु लागली, कारणं सापडू लागली आणि स्वत:बद्दलचा अनादर कमी होवू लागला. एक विलक्षण आत्मविश्वास त्यांना जाणवू लागला आणि यापुढे आयुष्य सुखात जाणार, कमितकमी आपण तसा प्रयत्न करणार, आपण चारचौघांसारखेच आहोत, जे आपल्याजवळ आहे त्यातच सुख भोगु वगैरे वगैरे लाखो विचार त्यांच्या मनात यायला लागले. गमतीची गोष्टं म्हणजे, हा मानसीक रोग काही फ़ायदेपण देतो असं डॉक्टर म्हणाल्याचं त्यांना आठवलं. कलेची आवड असणाऱ्यांना या रोगचा जास्तच फ़ायदा मिळतो. जगातील अनेक थोर कलावंत या रोगाने त्रस्त होते, पण ह्या रोगानी त्यांना बहाल केलेल्या "वेगळेपणा" मुळेच ते समाजात उठुन दिसले आणि यशस्वी झाले!

सुट्टी संपली आणि ती दोघे भारतात परतली. पूर्णपणे बदलून, प्रचंड आत्मविश्वास घेऊन आणि आता पर्यंत जे जे गमावलं ते परत कमवायला. दोघेही हुशार होतीच. हळु हळु नोकरीतही त्यांच्या बदलेल्या स्वरुपाची दखल घेतल्या जाऊ लागली. सोन्यावरची धुळ उडाल्याने सोनं लखलखून चकाकू लागलं. आपल्यातला वेगळेपणा हा श्राप नसून वरदान आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या ह्या क्षमतेचा वापर करुन उत्तुंग भरारी घेण्याकरिता नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय थाटला. थोड्याच कालावधीत आपल्या क्षेत्रात त्यांनी चांगलाच जम बसवला. अपेक्षेप्रमाणे ती दोघे केवळ व्यवसायीक भागीदार न राहता आयुष्याचीही भागीदार झाली.

काही वर्षांतच तो एक यशस्वी उद्योजक म्हणून नावजला. अनेक बिझनेस स्कूल्समध्ये त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावण्यात येऊ लागले. प्रत्येकवेळी लेक्चर संपल्यावर तो एक वाक्य सांगायला विसरत नसे, "इतिहास तेच घडवतात जे वेगळा विचार करु शकतात. चौकटी बाहेर विचार फ़ार कमी लोक करु शकतात. जगात सरळ रस्त्यावर चालणारे तुम्हाला बरेच भेटतील, पण वाकडी तिकडी का होइना, पण स्वत:ची वाट बनवणारे आणि स्वत:च्या इष्टस्थळी पोहोचणारे फ़ार कमी असतात." 

==========================================

(समाप्त)

Monday, April 19, 2010

वेगळा (भाग: १)

तो जरासा वेगळाच होता. जवळपास प्रत्येक बाबतीत. इतका की आजुबाजुच्यांना त्याचं वागणं कृत्रिम वाटायचं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या आवडी निवडी भिन्न आहेत हे केवळ स्वत:ला महत्वं प्राप्त करून देण्याकरता तो असा वागतो असं सर्वांना वाटायचं.

त्याला क्रिकेट आवडत नसे. गोड पदार्थांना तो नाक मुरुडत असे. जेवणात तूप बघितलं की त्याला घास जात नसे. ऐन उमेदीच्या काळात इतर मुलांप्रमाणॆ कर्कष्यं आवाजाची गाणी, डिस्को, पब्स, आवडलेल्या मुलीशी कमितकमी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, उछंद भटकणे, काही प्रसंगी धाडसीपणे वागणे असल्या गोष्टींमध्ये त्याला कधी रसच नव्हता. शाळेनंतर देखिल इतर मित्रांप्रमाणे प्रचलीत शिक्षणक्षेत्र निवडण्यात त्याला कधीही उत्साह नव्ह्ता. त्याच्या असल्या स्वभावामुळे तो बरेचदा एकटाच असायचा.

पौगांडावस्थेत त्याला आपल्यातील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवायला लागला. आपल्या आसपासच्या मर्यादित विश्वात स्वत:ला सामावून घेण्याचे अनेक असफ़ळ प्रयत्न त्यानी केले. इच्छा नसताना क्रिकेटची मॅच बघणे. मोठ्या आवाजात गाणी ऐकणे वगैरे. पण असल्या प्रकारात तो कधी रमलाच नाही. आडातच नसेल तर पोहऱ्यात कसं येणार? वाढत्या वयानुसार हे स्वभावविशेष अधिकच ठळक व्हायला लागले. मुळच्या उपजत स्वभावाला धरून जगावेगळं असं शिक्षणक्षेत्र त्याने निवडलं. सहाजीकच शाळेतील सगळे मित्र आणि तो वेगवेगळ्या वाटेनी आयुष्याचा प्रवास करू लागले. हळू हळू गाठी भेटी कमी होवू लागल्या. तोही नविन वातावरणात आणि मित्रांत रुळला. त्याच्या शाळकरी मित्रांप्रमाणे त्याच्या आई वडिलांनादेखिल त्याच्या जगावेगळ्या आवडीनिवडींबद्दल नवल वाटे. वडिलांचा जरी त्याच्या अप्रचलित क्षेत्रात शिक्षण घेण्यास विरोध होता, पण त्याच्यावर जबरदस्ती करणे त्यांना योग्य वाटले नाही. तो स्वत:देखिल त्याच्या वेगळेपणामुळे त्रस्तं होता. त्याच्या मनात सदैव "जगप्रसिद्ध" विरुद्ध "आपल्याला आवडते ते" असे द्वंद्व चालत असे. कधी "जगप्रसिद्ध" विचार जिंकत तर कधी "स्वाभिमानी" मन.

इतकं असून देखिल स्वत:ला नक्की काय हवं आहे ते त्याला कधी कळलं नाही. इतरांप्रमाणे जगावं, त्याच्यांसारखे छंद जोपासावे, तसल्याच आवडीनिवडी असाव्या असे त्याला सारखे वाटे. बरं तसा तो हुशार होता. अभ्यासातही आणि वागण्या बोलण्यातही. त्याची शालेय शैक्षणिक कारकिर्द बघून तो आयुष्यात अमाप पैसा मिळवणऱ्या क्षेत्रात जाईल असे अनेकांना वाटत असे, त्यालासुद्धा. पण वेगळेपणामुळे पैसा आणि प्रसिद्धी ह्या देखिल त्याच्या द्रुष्टीने अमहत्वाच्या गोष्टी होत्या. स्वत:ची कुशलता तो असल्या "वेगळेपणा" मुळे व्यर्थ घालवतो आहे असे त्याला वारंवार वाटे, पण स्वाभिमानी मन त्याला परावृत्त करत असे. 

वयं वाढत गेले. त्याचे शिक्षण आटोपले. अपेक्षेप्रमाणे चांगल्या पगाराची नौकरी मिळणे अवघड गेले. जी मिळेल ती पत्करून समाधान मानावे लागले. लग्नाचे वारे वाहू लागल्यावर साहाजीकच उपवर मुलींना त्याच्यातील वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव होवू लागली आणि नकार मिळायला लागले. ज्यांना तो आवडला त्यांनी त्याने नकार दिले. त्याचे आयुष्य चांगलेच भरकटले होते. त्याच्या स्वभावामुळे आई वडिल त्रस्त असायचे. त्याने स्वत:ने देखिल बदलायचे अनेक प्रयत्न केले, पण म्हणतात न, स्वभावाला औषध नाही.

अशा रितिने सांगुन यायच्या वयात मुली सांगून आल्या आणि हळू हळू तेही बंद झालं. इतक्या वर्षांच्या मानसिक आत्मसंघर्षानंतर तोदेखिल विटला होता. त्याचे नवे जुने मित्र अद्यापी संसाराला लागले होते त्यामुळे क्वचितप्रसंगीच ह्याच्यासाठी त्यांच्याजवळ वेळ असे. त्याला स्वत:लादेखिल इतर जोडप्यंमाध्ये संकोचल्यासारखं वाटे. अशारितीने आयुष्यात कुठलीही उजवी बाजू दिसत नव्हती. पण काही झाले तरी देवाला साकडं घालायचं नाही हे त्यानी मनाशी पक्कं ठरवलं होतं. कारण तो "नास्तिक" होता.

पण शेवटी त्याच्या आयुष्याचा अरुणोदय़ झालाच. अनपेक्षेने "ती" त्याला भेटली. त्याच्या कचेरीत नव्याने रुजु झालेली. स्वभावाने त्याच्यासारखीच. वेगळी, एकटी, भरकटलेली आणि उदास. साहाजीकच ओळख पुढे नेण्यास कुणी धजावत नव्ह्तं. पण ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची संधी होती. कोणालातरी शब्दांचा बांध फोडणं आवश्यक होतं. त्याचा विश्वास असो का नसो, पण म्हणतात न, जगात देव आहे. एक प्रसंग असा घडला की त्याने आणि तिने आयुष्यात असे काही घडेल असा स्वप्नांत देखिल विचार केला नव्हता. ६ महिन्यांपूर्वी कामानिमित्त जवळच्या फ़ूड मॉलमध्ये एकत्र "लंच" करताना गंमत म्हणून त्या दोघांनी एका प्रतियोगीतेचा फॉर्म भरला होता आणि त्या दोघांना परदेशवारीची दोन तिकिटे मिळाली होती! सुरवातीला त्यांचा आपल्या (करंट्या) नशिबावर विश्वासच बसेना. दुसरी धास्ती म्हणजे तिचे आई वडिल तिला त्याच्या बरोबर एकटे पाठवतील का? पण तिचा मोठा भाऊ त्याच देशात वास्तव्याला असल्यामुळे ती धास्ती राहिली नाही. आणि त्याची तिच्या घरात चांगली प्रतिमा असल्याने तिचे आई वडिलदेखिल तयार झाले.

यथावकाश जाण्याचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गमनाचा दिवस उजाडला. आयुष्यात प्रथमवेळाच परदेशी जात असल्याने दोघांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. विमानाच्या लांबलचक आणि कंटाळवाण्या प्रवासात कधी नव्हे तो एकांत त्याना मिळाला. आसपासच्या आसनांवर सर्व परदेशी प्रवासी असल्याने सहसा बोलताना वाटणारा संकोच आज त्या दोघाना वाटत नव्हता. आपण काय बोलतो आहे हे कुणाला कळणार नाही ह्याची काळजी नसल्याने काही वेळातच त्यांच्यातील सामाजिक भिती अर्थात "सोशल अ‍ॅन्झाईटी" दूर झाली आणि ती दोघे बांध फोडून बोलू लागली. इतकी की केवळ त्यांच्या अमर्यादीत बोलण्याच्या आवाजाचा सहप्रवास्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांनी काही काळापुरते नमते घेतले.


विमान परदेशभुमीवर उतरलं आणि ती दोघे सर्व सरकारी सोपस्कार पार पाडून तिच्या भावाला भेटले. त्याच्या गाडीतून शहराकडे जाताना चोहूबाजूला असलेल्या गगनचुंबी काचेच्या इमरती, सुरेख व स्वच्छ रस्ते आणि तिच्या भावाचा अखंड सुरु असलेल त्या शहराबद्दलच्या माहितीचा रेडीओ, ह्यापैकी कशावरही त्या दोघांचे लक्ष नव्हते. ना त्यांना प्रवासाच्या सुरुवातीला असलेलं त्या देशाचं अप्रूप राहिलं होतं. ती दोघेही त्यांच्या विमानातील संभाषणाचा विचार करत होती. अनावधाने एकमेकांना झालेले एकमेकांचे स्पर्श, ती जवळीक आणि झोपेत नकळत तीने त्याच्या खांद्यावर टाकलेली मान, हे त्याला सारखे सुखावत होते. तशी तो दोघही अद्याप तरूणच होती. उमेदीचा बराचसा काळ उलटून गेला असला तरी झाडाला पालवी टिकून होती.


(क्रमश:)