Sunday, May 2, 2010

वेगळा (भाग: २)

घरी पोहोचल्यावर एक दोन दिवसांचे प्लॅन्स झाले. तीचा भाऊ कामात व्यस्त असल्याने पुढचे बरेचसे दिवस त्या दोघांनाच फ़िरायचे होते. त्याला तर ह्या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला होता. जसे जसे दिवस जाऊ लागले, त्याला तिचे रोज एक नवे रूप दिसू लागले. मनसोक्त भटकताना, गप्पा मारताना आणि हवा तसा श्रोता मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. दिवसोंदिवस ती त्याला अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या चेहऱ्या सकाळचा ताजेपणा होता.

असेच एकदा बोलता बोलता तिने विषय काढला. स्वत:च्या जगावेगळ्या आवडी निवडींबद्दल. प्रत्येक बाबतीत असेली मतांची तफ़ावत... छंद... जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन आणि मानसिक द्वंद्वातून आलेली मरगळ.... जणूकाही त्याचं प्रतिबिंबच. तिची व्यथा त्याला चटकन लक्षात आली. त्याला तिच्याबद्दल साहनूभुती तर वाटलीच, पण जगात आपण एकटेच असे नाही ह्याचा कुठेतरी एक स्वार्थी आनंदपण झाला. त्याने लगेच तसले विचार झटकून टाकले. बिचकत बिचकत स्वत:बद्दल देखिल सांगीतले. इतक साधर्म्य एकून क्षणभर तिचा विश्वासच बसेना. हा आपली थट्टा तर करत नाहीये ना? करत असल्यास फ़ार वाईट थट्टा आहे, असले विचार तिच्या मनात येऊन गेले. पण एव्हाना त्याच्या डोळ्यात पाणी तरारले होते. तो खरं बोलतोय हे तिच्या लक्षात आले.

एकमेकांचे अनुभव ऐकल्यावर दोघांनाही एकमेकांबद्दल वाईट वाटले. पण असं का? आपण असे का? ह्यात आपली काय चूक? सगळॆ करतात तेच आपणही केलच पाहिजे असा अट्टाहस का? जरी कुणी प्रत्यक्ष विरोध किंवा उपरोध केला नसला तरी एक अप्रत्यक्ष सामाजीक तणाव कशासाठी? अर्थात, ह्या प्रश्नांची उत्तरं दोघांकडेही नव्हती. तरीही, आलिया भोगासी असावे सादरं, हे काही त्यांना पटत नव्हतं. आपली परिस्थीती बदलावी, आपण आनंदी आयुष्यं जगावं, मित्रमैत्रिणींमध्ये एकरुप व्हावं असं दोघांनाही वाटत होतं.

यावर त्याने एक तोडगा सुचवला. अनेक दिवस त्याच्या डोक्यात हा विचार घुटमळत होता. "आपण एकदा मानसिकरोगतज्ञाकडे जाऊन बघुया का?" त्याच्या ह्या प्रश्नाने ती तिन ताड उडालीच! "काय??" आपण वेगळे म्हणजे मानसिक रोगी?? तिला गरगरायला लागलं. ति थोडावेळ काहीच बोलली नाही. धक्का सावरल्यावर काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला, "हे बघ चक्रावू नकोस. माझ्या वाचण्यात एक लेख आला होता. त्यात दिलेल्या काल्पनिक उदाहरणाशी आपला स्वभाव तंतोतंत जुळतो. बरेच दिवसात ह्या बाबतीत कुणाचातरी सल्ला घ्यावा असं वाटत होतं. पण आपल्या देशात मानसिकरोगतज्ञाकडे जाणे म्हणजे स्वत:ला पागल सिद्ध करण्यासारखं आहे. अनायसे हि संधी आपल्याला मिळाली आहे. आयुष्य रुळावर आणण्यासाठी जर डॉक्टरला भेटावं लागत असेल तर ही फ़ार छोटी किंमत आहे." हे सर्व ऐकल्यावर ती गंभीर झाली. आयुष्य बदलावं अस तिलाही वाटत होतं. आणि तोही तिच्यासारखाच असल्याने तिचा विश्वास बसला आणि त्यांनी प्रयत्नं करायचं ठरवलं.

भावाला सांगावं की नाही हादेखिल प्रश्नं होताच. पण तो तिथला स्थानिक असल्याने त्याची मदत होवू शकते आणि हि पायरी चढताना कुटुंबातील एखाद्या सदस्याला ठावूक असणे गरजेचे आहे हे दोघांनाही पटले. त्याच रात्री घरी ह्यावर चर्चा झाली. तिच्या भावाला जरी हे सगळं निरर्थक वाटत होतं, पण आपल्या बहिणीच्या डोळ्यातील पाणी बघुन त्याला परिस्थीचा अंदाज आला आणि त्याने एक तज्ञ सुचवला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती दोघे तज्ञाकडे रवाना झाली. सुमारे तास दोन तासांच्या कंसल्टेशन नंतर एक विचित्र बातमी त्यांना मिळाली. त्याची भिती खरी होती. त्या दोघांना एक विचित्र मानासिक आजार होता. त्यांच्या वयक्तीक आणि व्यवसायीक दुर्गतीस कारण त्यांचं वेगळेपण नसून हा आजार होता. धरसोड व्रुत्ति, ठरवलेल्या गोष्टी पुर्णत्वास न नेणे, आपल्याच मतांचा होणारा घोळ, स्वत:ला नक्की काय हवयं ते न कळणे आणि जोडीला अत्यंतं लहरी स्वभाव, ही सर्व लक्षणं होती "बायपोलर डिस-ऑर्डरची". दुर्मिळ नसणारा पण प्रखरता सहसा कमी असणारा हा मानसीक आजार त्यांना वेढून होता. आजार होण्यामागचं कारण हे जेनेटीक असल्याने नक्की दोष कुणालाही देता येत नव्हता.

आपल्याला मानसिक रोग आहे हे कळल्यावर तिला रडूच कोसळले. पण इतर मानसिक रोगांप्रमाणे हा समाजोप्रदवी रोग नसून थोडे व्यायाम आणि औषधी यांनी आटोक्यात ठेवता येतो हे ऐकल्यावर दोघांनाही हायसं वाटलं. डॉक्टरचं बोलणं आठवून ती दोघे स्वत:च्या स्वभावाबद्दल, आयुष्यातील चुकांबद्दल आणि सद्यपरिस्थीबद्दल विचार करु लागली. हळु हळु समिकरणं जुळु लागली, कारणं सापडू लागली आणि स्वत:बद्दलचा अनादर कमी होवू लागला. एक विलक्षण आत्मविश्वास त्यांना जाणवू लागला आणि यापुढे आयुष्य सुखात जाणार, कमितकमी आपण तसा प्रयत्न करणार, आपण चारचौघांसारखेच आहोत, जे आपल्याजवळ आहे त्यातच सुख भोगु वगैरे वगैरे लाखो विचार त्यांच्या मनात यायला लागले. गमतीची गोष्टं म्हणजे, हा मानसीक रोग काही फ़ायदेपण देतो असं डॉक्टर म्हणाल्याचं त्यांना आठवलं. कलेची आवड असणाऱ्यांना या रोगचा जास्तच फ़ायदा मिळतो. जगातील अनेक थोर कलावंत या रोगाने त्रस्त होते, पण ह्या रोगानी त्यांना बहाल केलेल्या "वेगळेपणा" मुळेच ते समाजात उठुन दिसले आणि यशस्वी झाले!

सुट्टी संपली आणि ती दोघे भारतात परतली. पूर्णपणे बदलून, प्रचंड आत्मविश्वास घेऊन आणि आता पर्यंत जे जे गमावलं ते परत कमवायला. दोघेही हुशार होतीच. हळु हळु नोकरीतही त्यांच्या बदलेल्या स्वरुपाची दखल घेतल्या जाऊ लागली. सोन्यावरची धुळ उडाल्याने सोनं लखलखून चकाकू लागलं. आपल्यातला वेगळेपणा हा श्राप नसून वरदान आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या ह्या क्षमतेचा वापर करुन उत्तुंग भरारी घेण्याकरिता नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय थाटला. थोड्याच कालावधीत आपल्या क्षेत्रात त्यांनी चांगलाच जम बसवला. अपेक्षेप्रमाणे ती दोघे केवळ व्यवसायीक भागीदार न राहता आयुष्याचीही भागीदार झाली.

काही वर्षांतच तो एक यशस्वी उद्योजक म्हणून नावजला. अनेक बिझनेस स्कूल्समध्ये त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावण्यात येऊ लागले. प्रत्येकवेळी लेक्चर संपल्यावर तो एक वाक्य सांगायला विसरत नसे, "इतिहास तेच घडवतात जे वेगळा विचार करु शकतात. चौकटी बाहेर विचार फ़ार कमी लोक करु शकतात. जगात सरळ रस्त्यावर चालणारे तुम्हाला बरेच भेटतील, पण वाकडी तिकडी का होइना, पण स्वत:ची वाट बनवणारे आणि स्वत:च्या इष्टस्थळी पोहोचणारे फ़ार कमी असतात." 

==========================================

(समाप्त)

3 comments:

  1. "इतिहास तेच घडवतात जे वेगळा विचार करु शकतात.".....सहमत!!!....छान लिहल आहेस रे!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद मनमौजी! दुसऱ्या भागाला विलंब झाल्याबद्दल क्षमस्व. दोन तीन शेवट डोक्यात होते. शेवटी हा निवडला.

    ReplyDelete
  3. सॉलिड भाई.
    आवडला शेवट आणि कथाही!

    ReplyDelete