Showing posts with label सहजच. Show all posts
Showing posts with label सहजच. Show all posts

Monday, August 23, 2010

मोठेपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... ह्या सुभाषीतावर दुमत व्हायचं कारण नाही. मोठी माणसे (वयानी) नेहमी बालपणाचं कौतुक करताना दिसतात. मी देखिल त्याला अपवाद नाही. लहानपणी काय कसलाच ताण नाही. दररोज ऑफ़िसला जाणं, घरासाठी खरेदी करणं, बिलं भरणं, कर्जांचे हप्ते, मुलांच्या शाळा, त्यांचं संगोपन, आयकर भरणं, इतर जबाबदाऱ्या कसलही टेन्शन नाही. आरामात आयुष्य जगण्याचा खरा आनंद केवळ बालपणात लुटता येतो.

प्रौढावस्थेतून बालपणात परतण्याचं एखादं यंत्र असतं तर काय मजा आली असती नाही? पण प्रामाणिकपणे विचार केल्यास किती प्रौढांना परत बालपणात जावसं वाटेल? प्रौढांवर अनेक जबाबदाऱ्या असतात हे मान्य. पण वयानुसार येणारा अनुभव आणि आदर लहान मुलांना खरच मिळतो का? एखादं कटकट करणारं कार्ट आपण हिडिस फ़िडिस करुन हाकलून लावू शकतो, लहान वयात मुलांना विशेष आदर देण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण आपण लहान असताना कुणी आपल्याशी असं वागतं तेव्हा खरच आपल्याला आवडतं का? बरं तुच्छतेने वागणारा आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्याची चुक असून देखिल वयोमानानुसार उलट उत्तर देता येत नाही. पण एखाद्या प्रौढाशी आपण तसं सहसा वागू शकतो का? अनेक कर्तुत्व करण्याचं कौशल्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचं सामर्थ्य हे प्रौढावस्थेतच येतं.

लहानपणी रोजची शाळा, अभ्यास, आई वडिलांचा धाक, अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून न करता येणं आणि आजच्या वातावरणातला ताण यासारख्या जबाबदाऱ्या, न कळता का होईना, असतातच. शाळेत अव्वल येण्यासाठी, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लहानपणी देखिल असह्य ताणं झेलावा लागतो. प्रौढांप्रमाणे हवी ती वस्तू विकत घेणे, वाटेल तेवढा वेळ टि.व्ही. बघणे, कुठल्याही वयोगटाशी कुठल्याही विषयावर चर्चा करणे या सारख्या मोठीपणी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी लहानपणी सहसा वर्ज्य असतात. थोडक्यात म्हणजे लहानपण हे स्वातंत्र्याला पारखं असतं. स्वातंत्र्य असायला हवं की नाही हा इथे मुद्दा नाही. पण साधारणत: ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. ५-६व्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते "क्युट" या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्ह्यायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. "लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक", असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विषेश अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सुचीत करायचं नाहीये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला ६ महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदाऱ्या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा  उगिचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षीतो? बहुदा या भावेनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.

माझे बालपण अतिशय त्रासात गेले असे नाही. तेही चारचौघांसारखेच होते. पण त्यावेळी लवकर मोठे होण्याची फ़ार इच्छा होती. आता (वयाने) मोठा झाल्यावर बालपणातल्या आठवणीत कधीकाळी रमायला आवडतं, पण परत लहान होणं? नको रे बाबा... मोठेपण ठेवा देवा...

Monday, May 10, 2010

काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं


परत एकदा पक पक पकाक बघत होतो. त्यात मधेच एक दु:खी पण अप्रतिम अशी ओळ आहे... "काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं, फ़िरून उकरावं, कशापायी?" माझ्या या पोस्टचा आणि चित्रपटातील प्रसंगाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मग संदर्भ सोडून हे वाक्य मी का निवडलं? तर काळाच्या मुठीतून जे निसटून गेलं आहे ते परत उकरुन काढण्यासाठी!

आजच्या माहिती तंत्रद्यानाच्या जगात बऱ्याचश्या मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा उकरुन काढता येतात. उदाहर्णार्थ जुन्या जाहिराती. मध्यंतरी "युट्युब" वर वेळ घालवताना अर्थात टि.पी. करताना काय काय सापडलं म्हणून सांगू! गोंडस पारशी मुलाची "जलेबी" वाली धारा तेलाची जाहिरात... अजन्ता घडाळ्याच्या ठोक्याना ताल देणारी आजी.. एशियन पेंटसची जवान सिमेवरून परत येतो आणि आरती घेताना आपल्या मुलाच्या हातावरून हात फ़िरवतो... फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीतर विचारायलाच नको! पारले जी ची "हमको पता है जी" वाले आजोबा आणि नातवंडं....इथपासून तर बुलंद भारत की बुलंद तस्वीर.....हमारा बजाज पर्यंत... खोटं वाटेल... पण अक्षरशह: डोळ्यातून पाणी आलं... का ते कळलं नाही. काळच्या ओघात वाहुन गेलेलं निरागस बालपण आठवल्यामुळे असेल कदाचीत....

तर हिप्नोटाईज्ड झाल्यासारखा मी एकामागून एक व्हिडीयोज बघायला लागलो. "एक चिडीया" आणि "मिले सुर मेरा तुम्हारा" बघुन तर लहान मुले कार्टुन बघताना करतात तसा माझा चेहरा झाला होता:) "पूरबसे सुर्य उगा" वाली साक्षरता मिशनची जाहीरात बघून खरच सरकारी माध्यमांचं कौतुक करावसं वाटलं. त्याकाळी मोजकी साधनं असुनही जनजागृतीची ही अप्रतीम जाहिरात त्यानी बनवली होती.

ही पोस्ट केवळ जुन्या जाहिरातींबद्दल नाही. काही जीव्हाळाच्या गोष्टी; ज्यांचा कालांतराने त्या कालबाह्य झाल्याने विसर पडला, त्या उकरुन काढण्यासाठी ही पोस्ट. त्यापैकी काहींची यादी खालील प्रमाणे....

लहान मुलांसाठी असलेलं एकमेव मराठी कॉमिक्स...... "चांदोबा"

डस्टर-पिंजर-खार-कबुतर-ढोली असला "रॉक-पेपर-सिझर" चालीवरचा मराठी खेळ (मी कबुतरला खब्बुतर म्हणत असे कारण खार म्हंटल्यावर कबुतर पेक्षा खब्बुतर म्हणणं सोपं पडे :))

मुलींकरता असलेला खेळ.....भुलाबाई (मी लहान असताना माझ्या बहिणीबरोबर जात असे. भुलाबाईचे गाणे थोडे थोडे अजुनही आठवतात. त्यात अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता.... भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असल्या चालीवर एक यमक जुळणारं गाणं होतं, ते माझं "फ़ेव्हरेट"!)

कंचे (कंचे म्हणजे खेळण्यातले काचेचे मार्बल्स) आणि कंच्यासारख्याच पण पांढऱ्या, दगडी आणि मोठ्या असलेल्या पखांड्या.

अंधळी कोशींबीर... (हि बहुदा अजुनही खेळली जाते)

डोंगराला आग लागली पळा पळा नावाचा एक मैदानी खेळ होता.... तो कसा खेळतात ते आता आठवत नाही :(


आमलेट की चॉकलेट हा ७ चौकट आखुन खेळाला जायचा. त्याची रचना
 खालीलप्रमाणे होती.



क्रमाक्रमाने एक एक रकान्यान दगड टाकत जायचा आणि ज्या रकान्यानत दगड असेल त्या रकान्याशिवाय उरलेल्या रकान्यात लंगडी घालत जायचं आणि परत यायचं. दगड ठरलेल्या रकान्याच्या बाहेर गेला किंवा दोन्ही पाय जमिनीला टेकले की खेळाडू बाद!

उन्हाळ्यात पाहुणे घरी आले कि दुपारी ठरलेला खेळ..... व्यापार आणि पट (होय...तोच शकुनी मामावाला). शिवाय सत्ते लावणी, पाच-तिन-दोन, रमी हे ही होतेच.

पावसाळ्यात मामाच्या गावी एक "खुपसणी" नावाचा खेळ असायचा. लोखंडाची सळाख दुर फ़ेकायची. ओल्या जमिनीमुळे ती आत खुपसायची म्हणून खुपसणी!

युनिसेक्स खेळ.... लगोरी.

सर्वात लोकप्रिय हिंदी कॉमिक्स.... चाचा चौधरी (चाचा चौधरी का दिमाग कॉम्प्युटरसेभी तेज चलता है! :))

दुरदर्शन वरिल गाजलेल्या मालिका..... चंद्रकांता, स्कूल डेज, सॅम और गोपी वाली तहकीकात, पंकज कपूर ची फ़टीचर आणि करमचंद जासुस, अलिफ़ लैला, अफ़साने, इ. इ.

सध्या इतकाच.... तुम्हाला आठवलं असं काही तर मलाही कळवा!

Sunday, April 18, 2010

सल्ला

असं म्हणतात की आयुष्यात फुकट मिळणारी एकमेव वस्तू म्हणजे "सल्ला". आता वकिलांचा अपवाद सोडला तर ही गोष्टं तशी सत्यच म्हणायला हवी. वकिलांशी माझा (सुदैवाने) कधीही संबंध न आल्याने कमीतकमी मला तरी ही फुकटी वस्तू हिमालयात बर्फ़ मिळावा तेवढ्या विपूलतेने मिळाली.

तशी सल्ल्याची सुरुवात ही बहुदा घरातील वडिलधाऱ्यांपासून होते. अनेकदा वडिलधारी मंडळी या सल्ल्यांना "मार्गदर्शन" असे गोंडस नाव देतात. अर्थात काहीप्रमाणात ते मार्गदर्शन जरी असलं तरी वडिलधारी मंडळी बरेचदा आपला उपजत "सल्लेगिरी" चा मोहं अश्या रितीने भागवत असते. मला वाटतं की माणसाच्या अनेक गरजांपैकी दुसऱ्याला सल्ला देणे, ही देखील एक गरज असावी. कारण बरेचदा आपला सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही हे ठाऊक असून देखील, फक्त तो ऐकला गेला तरी लोक समधानी होतात. आपलं ह्या जगात काही महत्व आहे हे समाधान, बहुदा हे त्यामागचे कारण असावे.

माझा सल्ला घेण्यास तसा विशेष आक्षेप नाही. पण ज्या लोकांचा एखाद्या ठराविक परिस्थितीशी कुठलाही संबंध नसतो आणि ज्याना कुठलाही अनुभव नसतो अश्यावेळी त्या सल्ला देण्याऱ्यांचं मला फार हसू येतं. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार होता. त्या बिचाऱ्यावर तर सल्ल्यांचा इतका मारा झाला. म्हणजे परदेशात कसं वागावं, काय सोबत न्यावं इथपासून तर किती परदेशी चलन सोबत नेता येतं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आवडी निवडी कोणत्या इथपर्यंत सगळ्या सांभावीक आणि असांभावीक घटनांवर सल्लेबाजी झाली. यातील गमतीची बाजू म्हणजे "सल्लेगार समिती" मधील एकही प्रतिनिधी कधी देशाबाहेर गेला नव्हता!

अनेकजण फ़ुकट सल्ल्याला "मदत" असही म्हणतात. अनेकदा सद्यपरिस्थीतीबद्दल स्वत:चं मत ठोकताना असले मदतनीस "माझ्या एका मित्रासोबत अगदी असचं घडलं होतं." हे वाक्यं लावून एखाद्या मिळत्या जुळत्या काल्पनीक परिस्थीतीचा आधार घेऊन सल्ला देतात. (ह्यांचे मित्रदेखील किती असतात हो? मला एकदा त्या प्रत्येक "मित्राला" प्रत्यक्ष भेटायचं आहे). बरं मित्राचा संदर्भ वापरण्याचे फायदे तीन. पहिला म्हणजे सल्ला देताना अनुरूप परिस्तिथीचा आपल्याला अनुभव आहे हे सिद्धं करणे. दुसरा म्हणजे काल्पनिक मित्राचा संपूर्ण "बायो डेटा" काढण्यात कुणाला फारसा रस नसल्याने "त्या" मित्राच "रेफ़रन्स चेक" कुणी करत नाही. तिसरी आणि सर्वात मुख्य म्हणजे दिलेला सल्ला चुकीचा ठरला तर तो सल्ला आपल्या "मित्राच्या" परिस्तिथीला उद्देशून दिला असल्याने सल्ल्याची जबाबदारी पूर्णपणे टाळणे. त्याचवेळी, जर सल्ला (चुकुन) उपयोगी पडला पाठ थोपटवून घेणे.


दुर्दैवानी, सल्लेगार समितीपासून स्वत:ला वाचवण्याचा तसा कुठलाही शास्त्रीयं तोडगा अद्याप उपलब्ध नाही. आणि नजिकच्या भविष्यात तसलं काही होण्याची चिन्हेदेखिल दिसत नाहीत. त्यामुळे अनावश्यक सल्ला "ऐकावे जनाचे करावे मनाचे" हे लक्षात ठेऊन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावा, हा एकच सल्ला मी सर्वांना देऊ इच्छितो!

Sunday, March 28, 2010

बावळटपणा

बावळटपणा आणि त्यातल्या त्यात बावळट व्यक्ति हा माझ्याद्रुष्टीने फ़ार गहन अभ्यासाचा विषय आहे. (मी बावळट आहे असे मानणारे माझे अनेक हितशत्रू आहेत. पण बोलून चालून ते माझे हितशत्रू असल्याने मी त्यांचे माझ्याबद्दलचे विचार जास्त मनाला लावून घेत नाही ;-))

असो, तर मे ह्या जातीचा (इंग्रजीतील "स्पेसिस" हो....नाहीतर तुम्हाला भलतच काही वाटेल) फ़ार सखोल अभ्यास केला आहे. हा लेख माझ्या आकलनावर आणि निष्कर्षावर आधारित आहे.

बावळट व्यक्ति ह्या देवाप्रमाणेच सर्वत्र आढळतात. काही ठिकाणी देवाच्या वास्तव्यालादेखिल मज्जाव असेल पणं बावळट व्यक्तिंना नाही. बावळट व्यक्ति हि सहसा उच्च पदावर आढळते. आणि (माझ्यप्रमाणे) अनेक सुज्ञ व्यक्तिना असल्या लोकाना "साहेब" किंवा "सर" किंवा "बॉस" म्हणण्याची पाळी येते. बावळट व्यक्तिचं सर्वात लक्षं वेधून घेणारं "कॅरॅक्टरिस्टिक" (शाळा सोडून बरीच वर्ष झालीत... नेमके शब्दं आठवत नाहीत हो :-() म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलणे आणि आपले पितळ उघडे पडले आणि अपेक्षित यश नाही मिळाले की त्याचे खापर आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांवर (?) फोडणे. थोडक्यात म्हणजे, "कुणाच्या खांद्यावरं कुणाचे ओझे" ह्या पंक्तिला शोभेसी एखाद्या दुबळ्या कनिष्ट कर्मचाऱ्याची अवस्था आढळल्यास आसपास "त्या" व्यक्तिचा "संचार" आहे हे ओळखावे.

बावळट व्यक्ति ह्या बरेचदा "सहकर्मचारी", "सहपाठी" (हे मुख्य:त्वेकरून महाविद्यालयात आढळतात आणि "ग्रूप प्रोजेक्ट" च्या वेळी आपले खरे रूप दाखवतात. त्यावेळी आपण ते बावळट आहे म्हणून सगळं प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि त्याना बावळट म्हणतो) असल्या "पोटजातीत" आढळतात. महिलावर्गाच्या द्रुष्टी ने समस्त पुरुषवर्ग मुख्यत: नवरा आणि प्रियकर हा "बावळट" ह्या प्रकारात मोडतो. वर वर आपल्या नवऱ्याची (दुसऱ्या) महिलांसमोर कितिही प्रशंसा करत असल्या तरी मनातून "आमचं सोंग बावळट आहे. मी आहे म्हणून सांभाळून घेतलं, दुसरी कुणी असती तर ६ महिनेदेखिल नसती टिकली ह्या घरात" हे बोधवाक्य मनाशी पक्कं असतं. अर्थात असल्या बावळटपणाचे "फायदे" हे पुरुषवर्गाला ठाऊक असल्याने तेही "येडा बनके पेडा खानेमे" खुश असतात ही त्यातली गोपनीय बाजू.

परन्तु हाताखालची आणि क्वचितप्रसंगी हाताशेजारची (म्हणजे मित्रं, रूम मेट्स ई. ई.) व्यक्ति जर बावळट असेल आणि कोणतीहि आपल्याला "गोत्यात" आणू शकणाऱ्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर नसेल तर मग आपली चैनच चैन! कधितरी आपल्यातील "स्मार्टपणा" मिरवण्याची हुक्की आली की असले लोक फार कामात येतात. माझं हे वाक्य जर तुमच्या पांढरपेशी मनाला तडा देत गेलं असेल तरं क्षमस्व: (ह्या प्रसंगी सर्वप्रथम नमूद केलेल्या बावळट व्यक्तिला स्मरावे आणि "इट्स ऑल अबाऊट बॅलंसिंग" असं म्हणून समाधान मानावे)

तश्या अजून अनेक पोटजाती आहेत. उदर्ह्र्णार्थ लांबच्या प्रवासातील सहप्रवासी, कपडे बिघडवणारे शिंपी, फाडणारे धोबी, पाण्यात दूध टाकून विकाणारे दूधवाले, नियमीत उशीरा येणारे बस चालक इथपासून तर खोटी आश्वासनं देणारे राजकीय नेते इथपर्यंतं सगळीकडे बावळट व्यक्तिंचा बाजार आहे. (मुद्दा एवढाच की हि सगळी मंडळी बावळट आहे की हे सगळं माहिती असूनसुद्धा वर्षानूवर्ष त्याच लोकांवर विश्वास ठेवणारे आपण ...:))

बावळटपणाचे तसे अनेक फ़ायदे देखिल आहेत. "मी माझा" फ़ेम चन्द्रशेखर गोखल्यांच्या एका चारोळीप्रमाणे:

                      "इथे वेडॆ असण्याचे
                     बरेच फ़ायदे आहेत
                      शहाण्याना जगण्याकरता
                      काटेकोर कायदे आहेत"


ह्याच धर्तिवर काही सुज्ञ लोक बावळट असण्याच सोंग घेतात. त्यांच्यावरिल सखोल अभ्यासानंतर काही कमालीची भन्नाट निरिक्षणं मला आढळून आली आहेत. एका बावळटपणाचं कातडं घातलेल्या "हुशार" व्यक्तिकडून कळलं की ह्या आवरणामुळॆ आयुष्यात कुठलेही महत्वाचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या आसपासचे म्हणजे कुटुंबात आणि कचेरीत हे सदैव स्वत:च्या आणि ह्यांच्या कामात आणि हे भाग्यवंत मधे तसेच! कोरडॆ! त्यामुळे त्यांना आयुष्याच्या एकूण प्रवासाचा कधीच जास्त त्रास झाला नाही. बरं आजूबाजूचे ह्यांच्यासमोर हुशारपणाची शेखी मिरवत ह्यांचं काम स्वत:हून पूर्ण करायचे आणि हे महाभाग तु हुशार तु हुशार करत आरामात जगले!

वरिल परिच्छेदाची दूसरी बाजू अशी की बावळट व्यक्तीला (किंवा तसे भासवणाऱ्या व्यक्तीला) सहसा कुणी तोंडावर बावळट म्हणत नसल्याने, त्या गोष्टीचा तसा काही फारसा त्रास होत नसतो. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात असले प्रश्नं बावळट लोकाना पडत नसल्याने आणि भासवणाऱ्यांना त्या गोष्टीचा फ़रक पडत नसल्याने सहसा अश्या व्यक्ति "निंदा" या प्रकाराला विशेष घाबरत नसतात.

अश्यावेळी हुशारी बरी की बावळटपणा हे मला अद्यापी न उलगलेलं कोडं आहे.....