Sunday, April 18, 2010

सल्ला

असं म्हणतात की आयुष्यात फुकट मिळणारी एकमेव वस्तू म्हणजे "सल्ला". आता वकिलांचा अपवाद सोडला तर ही गोष्टं तशी सत्यच म्हणायला हवी. वकिलांशी माझा (सुदैवाने) कधीही संबंध न आल्याने कमीतकमी मला तरी ही फुकटी वस्तू हिमालयात बर्फ़ मिळावा तेवढ्या विपूलतेने मिळाली.

तशी सल्ल्याची सुरुवात ही बहुदा घरातील वडिलधाऱ्यांपासून होते. अनेकदा वडिलधारी मंडळी या सल्ल्यांना "मार्गदर्शन" असे गोंडस नाव देतात. अर्थात काहीप्रमाणात ते मार्गदर्शन जरी असलं तरी वडिलधारी मंडळी बरेचदा आपला उपजत "सल्लेगिरी" चा मोहं अश्या रितीने भागवत असते. मला वाटतं की माणसाच्या अनेक गरजांपैकी दुसऱ्याला सल्ला देणे, ही देखील एक गरज असावी. कारण बरेचदा आपला सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही हे ठाऊक असून देखील, फक्त तो ऐकला गेला तरी लोक समधानी होतात. आपलं ह्या जगात काही महत्व आहे हे समाधान, बहुदा हे त्यामागचे कारण असावे.

माझा सल्ला घेण्यास तसा विशेष आक्षेप नाही. पण ज्या लोकांचा एखाद्या ठराविक परिस्थितीशी कुठलाही संबंध नसतो आणि ज्याना कुठलाही अनुभव नसतो अश्यावेळी त्या सल्ला देण्याऱ्यांचं मला फार हसू येतं. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार होता. त्या बिचाऱ्यावर तर सल्ल्यांचा इतका मारा झाला. म्हणजे परदेशात कसं वागावं, काय सोबत न्यावं इथपासून तर किती परदेशी चलन सोबत नेता येतं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आवडी निवडी कोणत्या इथपर्यंत सगळ्या सांभावीक आणि असांभावीक घटनांवर सल्लेबाजी झाली. यातील गमतीची बाजू म्हणजे "सल्लेगार समिती" मधील एकही प्रतिनिधी कधी देशाबाहेर गेला नव्हता!

अनेकजण फ़ुकट सल्ल्याला "मदत" असही म्हणतात. अनेकदा सद्यपरिस्थीतीबद्दल स्वत:चं मत ठोकताना असले मदतनीस "माझ्या एका मित्रासोबत अगदी असचं घडलं होतं." हे वाक्यं लावून एखाद्या मिळत्या जुळत्या काल्पनीक परिस्थीतीचा आधार घेऊन सल्ला देतात. (ह्यांचे मित्रदेखील किती असतात हो? मला एकदा त्या प्रत्येक "मित्राला" प्रत्यक्ष भेटायचं आहे). बरं मित्राचा संदर्भ वापरण्याचे फायदे तीन. पहिला म्हणजे सल्ला देताना अनुरूप परिस्तिथीचा आपल्याला अनुभव आहे हे सिद्धं करणे. दुसरा म्हणजे काल्पनिक मित्राचा संपूर्ण "बायो डेटा" काढण्यात कुणाला फारसा रस नसल्याने "त्या" मित्राच "रेफ़रन्स चेक" कुणी करत नाही. तिसरी आणि सर्वात मुख्य म्हणजे दिलेला सल्ला चुकीचा ठरला तर तो सल्ला आपल्या "मित्राच्या" परिस्तिथीला उद्देशून दिला असल्याने सल्ल्याची जबाबदारी पूर्णपणे टाळणे. त्याचवेळी, जर सल्ला (चुकुन) उपयोगी पडला पाठ थोपटवून घेणे.


दुर्दैवानी, सल्लेगार समितीपासून स्वत:ला वाचवण्याचा तसा कुठलाही शास्त्रीयं तोडगा अद्याप उपलब्ध नाही. आणि नजिकच्या भविष्यात तसलं काही होण्याची चिन्हेदेखिल दिसत नाहीत. त्यामुळे अनावश्यक सल्ला "ऐकावे जनाचे करावे मनाचे" हे लक्षात ठेऊन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावा, हा एकच सल्ला मी सर्वांना देऊ इच्छितो!

No comments:

Post a Comment